Tuesday, February 24, 2009

रुळलेल्या वाटा आणि पोळलेली मने...

टायटल वाचल्यावर, विषय गंभीर आहे असं वाटतय ना! हम्म... पण विषय गंभीर आहे किंवा नाही यापेक्षा तो कसा समजावून घेतला जातोय हे महत्त्वाचं आहे. मला जे जाणवल, ते फक्त इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
लहान असताना, एक प्रश्न मला बरयाचदा विचारला जायचा, 'काय मग तू मोठेपणी कोण होणार?' मी फारसा विचार न करता सांगायचे 'मी डॉक्टर होणार.' अस मी का सांगायचे हे मला त्यावेळी सांगता नसते आले. कदाचित 'डॉक्टर' होण हे मला एक प्रतिष्ठेच लक्षण वाटायच. पण मग मला हे समजल कुठून? मोठ्या लोकांच्या गप्पांमधून? अमक्याचा मुलगा डॉक्टर झाला, तमक्याची मुलगी इंजिनिअर झाली. नाव काढल हो पोरांनी.' त्यांना मिळणारा भाव पाहिल्यावर, स्वतःहालाही अशाच भूमिकेत जगासमोर मांडल्यावर आपणही चांगले नाव कमावल्यासारखे होईल अशी माझ्या मनाची समजूत झाली असणार. नक्कीच!
खरच डॉक्टर, इंजिनिअर याच ठराविक वाटा आहेत का चांगल करिअर घडविण्याच्या? इथे मी, या करिअरमधे असणारया किंवा करिअर घडवू पहाणारयांकडे बोट दाखवत नाहीये. तर मला असं म्हणायचय की लहानपणी मूल जेव्हा घडत असतं तेव्हा कुठलीही गोष्ट त्याच्या मनावर बिंबवण्यापेक्षा, त्याच्या मनाचा नैसर्गिक कल जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याच करिअर घडल तर ते खरया अर्थाने त्याला आयुष्यभर समाधान देत राहील.
'job satisfaction' ही संज्ञा कुठून आली? आज मी कितीतरी मुला-मुलींना पहाते,इंजिनिअरींगची डिग्री घेऊन चांगल्या नावाजलेल्या कंपनीमधे नोकरी करतायत. पगारही चांगला आहे! पण नोकरीमधे समाधानी नाहीत. नोकरीची सुरूवातीची वर्षे नव्या नवलाईमुळ छान वाटतात. पण नंतर जेव्हा जाणवायला लागत की या नोकरीमधे स्वतःचा interest/liking कमी आहे, तेव्हा मन अस्वस्थ व्हायला लागत. मग जाणवत की आपण हे करिअर निवडताना 'मनाचा कौल' घेतलाच नाही. केवळ रूळलेल्या वाटेवरून चालत गेलो. आपण ज्याप्रकारची नोकरी करतोय तिथे आपल्यामधे असलेलं potential/talent पुरेपूर वापरल जात नाहीये. ही जाणिव सतत टोचत रहाते. अशावेळी काहीजण PG करायच ठरवतात. पण यावेळीमात्र निर्णय डोळसपणे घेतला जातो. PG कशात करायच? का करायच, कुठे करायच, माझा interest कशामधे आहे इ. पुन्हा पहिले पाढे गिरवायचे नसतात ना म्हणून!
काहीजण मी असेही पाहिले आहेत, ज्यानी चांगल्या पगाराची/हुद्द्याची नोकरी सोडली. प्रमुख कारण म्हणजे No job satisfaction. आणि नंतर पूर्णवेळ प्रशासकीय सेवेत जाण्याची तयारी सुरू केली. त्यामधे ते यशस्वीसुद्धा झाले. अशाप्रकारे नवीन मार्ग शोधून तिथे आपले बस्तान बसविणारे नक्कीच समाधानी होतात. पण ज्यांना दुसरा मार्ग सापडत नाही किंवा सापडला तरी परिस्थितीमुळे तो मार्ग निवडणे त्यांना शक्य होत नाही त्यांच काय? अस नाही की ते आयुष्यात यशस्वी नसतात. पण जर job satisfaction नसेल तर potential असूनही ते १००% देऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी आयुष्य खूप मेकॅनिकल होऊन जात का? (Rock On मधे फरहान अख्तरने जे character केलय तसं).
काही लोक असतात ज्यांना खूप लवकर समजत की त्यांना आयुष्यात पुढे काय करायचय. पं. भीमसेन जोशी हे असच एक व्यक्तिमत्त्व आहे. किती लहान वयात त्याना समजल होत की 'मला शास्त्रीय संगीत शिकायचय'. त्यावेळी गाण्यात करिअर घडवायच वगैरे असे विचारही त्यांच्या मनात आले नव्हते पण स्वतःची गाण्याची आवड त्याना कळाली होती. आणि पुढे त्यांची घडलेली कारकीर्द आपल्याला माहीत आहेच. अशा व्यक्ती खरच खूप भाग्यवान असतात.
हल्लीची मुले करिअरच्याबाबतीत अगदी चोखंदळ आहेत. दहावी-बारावीची परीक्षा देत असतानाच त्यांचे PG कशात करायच आणि कुठे करायच इथपर्यंतचे planning झालेले असते. पालक आणि मुलांनी करिअर निवडताना संवेदनक्षम राहिल तर पुढे कोमेजणारया/पोळणारया मनांचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

3 comments:

कस्तुरी said...

Khoopach chan Appu...keep it up..

Aparna said...

dhanyawad.. :)

Unknown said...

excellent article