Thursday, August 13, 2009
सांज ये गोकुळी सावळी सावळी...
मनाला एक अनामिक हुरहुर लावून जाते ही वेळ...
मनात जपलेल्या असंख्य गोष्टींचा गहिवर दाटून येतो. भावना व्यक्त करण ही प्रत्येकाची मानसिक गरज आहे. पण सगळ्याच वैयक्तिक गोष्टी या व्यक्त करण्यासाठी नसतात ना! काहीतरी खास असत जे फक्त आपल्याच मनाच्या एका कोपरयामधे जपून ठेवलेल असत. ही सांजवेळ मात्र या सगळ्या गोष्टींना मनाच्या पृष्ठभागावर घेऊन येते. एक स्वगत सुरु होत.. मनाच.. मनाशीच! पण या स्वगतामधलं एकटेपण नकोस होऊन जात कधी कधी.... मग मात्र मन कोणाच्यातरी वाटेकडे डोळे लावून बसतं. कोणीतरी आपल...मायेन जवळ घेणारं...कौतुकान पाठ थोपटणार...आपल म्हणण ऐकून घेणार...चूक असेल तर कान पकडून खडसावणार...
आपण अगदीच एकटेही नाही जगू शकत याची बोचरी जाणीव करुन जाते ही कातरवेळ...
तर कधी मोठ्या गोतावळ्यात वेढलेले असलो तरी आत कुठेतरी आपण एकटे आहोत हे वास्तवही समोर ठेवून जाते ही कातरवेळ..
मनाला एक अपूर्णतेची चुटपूट लावून जाते ही सांजवेळ...
Monday, August 10, 2009
प्रातःचलन
कधी आपल्याच 'इलाक्या'मधल्या पण पूर्वी कधी न गेलेल्या वाटेला लागयच तर कधी तळजाईची टेकडी गाठायची.
एकदा असचं फिरायला म्हणून बाहेर पडले. सकाळचे फिरणे म्हणजे भरभर चालणे अशी माझी व्याख्या. त्यानुसार मी वेगानेच चालत होते. इतक्यात शेजारुन एक मुलगा विरुद्ध दिशेने चालत गेला आणि जाता जाता एक टिप्पणी टाकून गेला. मोठ्याने गाण म्हणाला तो. कोणत माहितीये? 'हिची चाल तुरुतुरु..' मी माझ्याच विचारात चालत होते. पण गाण्याची ती ओळ टाकून ज्या चपळाईने तो तिथून पटकन निघून गेला तेव्हा मला जाणवल की हे आपल्यासाठीच होतं. आणि जेव्हा मला हे जाणवल तेव्हा मी दोन सेकंद आहे त्याच जागी स्तब्ध उभी राहिले. म्हणजे यावर काही प्रतिक्रीया द्यावी का आणि काय द्यावी असा विचार मनात येऊन गेला पण लगेच पुढच्या क्षणी मलाच हसू आले. म्हणजे मी काय तिथेच फसकन हसले नाही..(काय राव तेवढं कळतकी मला!!) पण योग्य वेळी सुचलेल्या त्या योग्य टिप्पणीबद्दल मला मनापासून हसू येत राहिले. नंतर मी मैत्रिणींना हा प्रसंग सांगितला तेव्हा त्यांनीसुद्धा हसून त्या मुलाच्या 'प्रसंगावधाना'(presence of mind) चेच कौतुक केले(?)
एकदा असच 'अपने इलाके'मे फिरत होते. हिवाळ्यातले थंडीचे दिवस असल्याने अजून पुरत उजाडलं नव्हत. पण सकाळी फिरायला येणारया लोकांची पुष्कळ वर्दळ होती रस्त्यावर. माझ्यासमोरुन एक जोडप चालत येत होत. पण काहीतरी विसंगती वाटत होत. बायको अगदी सैनिकी थाटात लेफ्ट-राईट करत चालत होती. म्हणजे डावा पाय पुढे येई तेव्हा उजवा हातही पुढ़े अगदी डोक्याच्या वरपर्यंत. आणि नजर अगदी समोर. आणि नवरामात्र अगदी अंग चोरुन, अवघडून गेल्यासारखा चालला होता. आपल्या बायकोच हे असं चालण फारच विचित्र वाटून लोक आपल्याकडेच बघत नाहीयेत ना या विचाराने अस्वस्थ झाल्यासारखा त्याचा चेहरा दिसत होता. मी म्हटल अहो काका कशाला एवढा विचार करताय.. सकाळच्यावेळी तरी मनसोक्तपणे फिरा सगळे ताण-तणाव ठेवा बाजूला! म्हणू दे कोणाला काय म्हणायचय ते! (हो पण मी मात्र हे मनातल्या मनात म्हटल. एक तर काका ओळखीचे नव्हते आणि त्यात काकूंचा पवित्रा आक्रमक होता. :P )
एकदा तळजाईची टेकडी उतरुन खाली येत होते तेव्हा माझ्यासमोर ४-५ जणींचे महिलामंडळ चालले होते. त्या सर्वजणी त्यांच्या विरुद्ध गटातल्या महिलांबद्दल बोलत होत्या. (विरुद्ध गट म्हणजे 'जानी दुश्मन' वगैरे नाही बर का. तर सध्या अनुपस्थित असलेल्या व्यक्तींचा गट.) आता मला हे कसे कळाले की त्या त्यांच्या विरुद्ध गटातल्या महिलांबद्दल बोलत होत्या? उत्तर सोपे आहे, त्यांच्या बोलण्यावरुनच समजले मला. ;) इतक्यात समोरुन आणखी ४ जणींचे महिलामंडळ आले. 'अय्या तुम्ही आत्ता खाली उतरताय म्हणजे खूपच लवकर आला असाल नाही का? आम्हाला सांगायच ना आम्हीपण आलो असतो.' समोरच्या गटातील एकजण म्हणाली. 'आम्ही रोजच एवढ्या लवकर येतो' अगदी ठसक्यात उत्तर दिल एकीने. मग दोन्ही गट आपापल्या दिशेने निघून गेले. पण पुन्हा गप्पांमधे विरोधी गटाचीच चर्चा. त्यावरुन समजले की आत्ता गेलेलाच त्यांचा विरोधी गट होता तर. सकाळी सकाळी तरी असल्या चर्चा टाळाव्यात नाही का. (पुन्हा मी हे मनातल्या मनातच म्हटले. हो उगीच धोका कशाला पत्करायचा.)
कधी एखादा आजोबांचा गट फिरत असेल तर त्यांच्या गप्पांमधून जगातल्या सगळ्या ठळक बातम्या ऐकायला मिळतात. त्यामुळे दोन-तीन दिवस पेपर वाचला नसेल तर त्या सगळ्या बातम्यांचा ऊहापोह तुम्हाला ऐकायला मिळेल. जस्ट फोलो देम फॉर समटाईम. :)
तळजाईच्या देवीच्या मंदिरामधला 'हास्यगट' मात्र माझ्यासाठी एक आकर्षणाचा भाग आहे. तिथे जमणारी बरीच मंडळी माझ्या आजोबांच्या वयाची आहेत. आधी थोडा प्राणायाम आणि मग मोठमोठ्यान हसण्याचा व्यायाम असा यांचा क्रम! मी मात्र जेव्हाजेव्हा या हसण्याच्या वेळी तिथे पोचते तेव्हा तिथ बसून त्या सर्वांच निरीक्षण करत रहाते. कृत्रिम का असेना पण हे हसू बाहेर पडल्यावर काहीतरी समाधान देऊन जात असावं. सगळ्या जबाबदारया, ताण यांचा निचरा होऊन रहातो आणि हलक होऊन उमललेल निरागस हास्य या आजोबांच्या चेहरयावर दिसत. नंतर त्यांच्या गप्पा कानावर येत रहातात. कोणाच्या मुलाचे/मुलीचे नुकतेच दोनाचे-चार झालेले असतात.. कोणाची मुल अमेरिकेत आहेत, तिथली त्यांची ख्याली-खुशाली.. कोणाच्या मांडीवर नुकतीच नातवंड खेळायला लागेलेली असतात.. कोणाच्या गावाकडच्या शेतीच्या गप्पा किंवा नुकत्याच गावाकडे झालेल्या जत्रेतल्या गमती.. अस बरच काही.एखादी लाही गरम केल्यावर तडतडते आणि नंतर फटकन फुटून अलगद फुलून येते. या मंडळींकडे पाहिल की असचं काहीस जाणवत. प्रत्येक कडू-गोड अनुभवातून अगदी तावून-सुलाखून बाहेर पडून, मग सगळ्या अनुभवांची शिदोरी जवळ ठेवून फुलून आलेल हे आयुष्य. त्यांच बोलण ऐकता ऐकता त्यातून पाझरणार चैतन्य, उत्साह, समाधान जाणवत रहात. मग मलाही फिरायला आल्याच समाधान वाटत. ते चैतन्य आणि उत्साह बरोबर घेऊन मग मीसुद्धा नविन दिवसाच्या तयारीला लागते. :):)
Monday, July 13, 2009
Tuesday, June 30, 2009
सर्दी... कुछ लेते क्यू नही?
दोन-तीन दिवसांपासून अगदी हैराण केलय या सर्दीने! एकदा सर्दी झाली की कमीतकमी चार दिवसांची पाहुणी असतेच. मग लवकर बरे होण्यासाठी कितीही औषध-पाणी करा, हिचा चार दिवसांचा मुक्काम ठरेलेलाच! आणि एकटी येत नाही हो.. डोकेदुखी, अंगदुखी-कणकण बरोबर बरोबर घेऊनच येते.
आक् छी.. excuse me... आ..आ..आक् छी.. exxxcuse me... आक् छी.. आक् छी.. आक् छी.. (मी नाही म्हणणार excuse me... जा.. :P)
माणूस कितीही धडधाकट,हट्टा-कट्टा असला तरी सर्दी झाल्यावर किती केविलवाणा दिसतो. नाही?
पूर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात यायची, एक सर्दीने बेजार झालेला माणूस - त्याची ती केविलवाणी अवस्था बघून त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला विचारत असतात, 'कुछ लेते क्यू नही?' हम्म्म्.. आता असं कुछ लेके सर्दी पटकन जात असती तर काय..!
काहीतरी लिहाव असं वाटल उगाचचं, पण सर्दीने डोक इतक बधिर आणि सर्दीमय झालय की काही(चांगल)सुचतच नाहीये. मग सर्दीवरच चार ओळी लिहिल्या..
'हाय हाय हाय ये सर्दी,
है मौसम भी बेदर्दी,
तेरे नाक मे दम कर देनेसे,
मेरा सिर भी फुटा जाये...'
'हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी' या हिंदी गाण्याच्या चालीवर या ओळी छान बसतील! मूळ गाण्यातल्या 'मजबूरी'ची जाग 'सर्दी'ने घेतलीये. त्यामुळे कमी पडलेले दोन शब्द भरून काढण्यासाठी पहिल्या ओळीमधे आणखी एक 'हाय' टाकली. पण ही तिसरी 'हाय़' या सर्दीसाठीच आहे बरे! ...अरे देवा... मी हे मघापासून काय बरळतीये... सर्दीमुळे डोकं अजिबातच चालेनासं झालय. खरच आता 'कुछ तो लेके मै सो जाती'...
काही का असेना पण या सर्दीमुळे एक दिवसतरी खरीखुरी हक्काची 'Sick Leave' घेता येते. ;) :)
Wednesday, June 24, 2009
पाऊस....
पाऊस, मनातल्या आठवणींना भिजवून जातो. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशा एक एक आठवणी बाहेर यायला लागतात. अगदी बालपणापासूनच्या..... डबक्यातल्या होड्या.. गारा वेचणं - तुझ्यापेक्षा माझ्याकडेच जास्त असं म्हणत पावसातच नाचणं, डबक्यात उड्या मारण, भिजण - भिजवण...... पाऊस सुरु व्हायचा तोच शाळा सुरु झाल्याची वर्दी देत! नवी पाठ्यपुस्तकं, नव्या वह्या.... त्या कोरया-करकरीत पानांचा वास अजूनही आठवतोय. नवा वर्ग, नवे वर्गमित्र, नवे शिक्षक.... मग बरयाचदा सुरुवात व्हायची ती - 'माझा आवडता ऋतू - पावसाळा'ने :)
वाढत्या वयाबरोबर पावसात भिजण्याचे वेडपण वाढलेले.... एकदा तर अचानक आलेल्या पावसाने क्लासपर्यंत पोचेतो चिंब भिजवून टाकलेले आणि आम्हा ३-४ जणींना असे क्लासच्या दारात पाहून सरांनी क्लासलाच सुट्टी दिलेली... आणि मग पुन्हा सायकलवरुन भिजत भिजतच घर गाठलेलं.....बालपणापासून, शाळा, कॉलेज आता ऑफीस, वयाची एकेक अंतरं पार केलेली, पण पावसाबरोबरचे असलेले हितगूज मात्र तेच.... मातीचा सुगंध (या सुगंधामुळेच लहानपणी मला पावसाळ्यात माती खायची खूप आवड होती :)).... पानाफुलांतून डोकावणारा ताजेपणा....कधी पावसात चिंब भिजण..... कधी झाडांना-पाना-फुलांना बिलगलेला पाऊस बघत रहाण...... तर कधी शांतपणे बाहेरचा पाऊस नुसताच ऐकत रहाण...... पावसावरच्या कविता, गाणी यांनी लावलेलं वेड...... वाढत्या वयाबरोबर पावसाबरोबरचे हे मैत्र अधिकच घट्ट होत गेलेले....
सांगण्यासारख खूप आहे, पण किती आठवणी सांगाव्यात? आता पूर्णविराम देतेच.. पण फक्त या लेखापुरताच कारण मनात भरुन आलेलं आठवणींचं आभाळ मात्र बरसल्याशिवाय निरभ्र व्हायच नाही.. :)
Thursday, June 18, 2009
एक(खरं तर अनेक) प्रश्नचिन्ह
लोक धर्माचे पालन करतात. पण धर्माचे पालन करता करता सहज अंधश्रद्ध होऊन जातात का आणि मग (अंध)श्रद्धाळू भाविकांच्या मनाचा ताबा घेऊन, त्याचेच भांडवल करुन पैसा कमावणारेही असतातच की!
आणखी एक अशाच प्रकारच पुस्तक मी पाहिल होत. त्यावर लिहील होत 'तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मिळतील' एका देवतेच चित्र त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होते. तर त्याच लॉजिक अस होत की, तुमच्या आयुष्यातली एखादी समस्या/किंवा भेडसावणारा एखादा प्रश्न मनात धरायचा. मग त्या पुस्तकाचे शेवटचं पान उघडायच.(शेवटच्या पानावर चौकटींच्या रकान्यांमधे आकडे लिहिलेले होते) आणि कोणत्याही एका आकड्यावर बोट ठेवायच. ज्या आकड्यावर बोट असेल तो आकडा पुस्तकामधे शोधायचा आणि त्या आकड्यासमोर जे लिहिलेले असेल ते त्या समस्येचे उत्तर किंवा ती समस्या निवारण्याचा उपाय असणार.
??????????????????????????
थोड गोंधळल्यासारख झालय मला. म्हणजे श्रद्धा-अंधश्रद्धा या बाबी एका बाजूलाच राहील्या, पण मग हे काय चाललय? आणि ते चालवून घेतल जातय म्हणून चाललय.... मला नुकतच वाचलेल्या शोधयात्रा या पुस्तकातील 'हा' उतारा आठवला.
हम्म्.. या गोष्टीवर विचार करावा तेवढ थोडच आहे.. आय नीड अ ब्रेक नाउ...
Monday, June 15, 2009
काही निवांत क्षण...




